रविवार, २१ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १९

 

अस्तित्व पटकथा भाग १९, 

अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


लग्न झाल्यावर उमा व मल्हारी सूर्यगावात आले. गावात आल्यावर देवाचे दर्शन घेतले गेले.

पुजारी त्यांकडून पूजेचं साहित्य घेऊन पूजा करतो. ती दोघे देवाच्या नंतर पुजारी काकांना नमस्कार करुन आशीर्वाद घेतात. गावातील अनेक लहान मुले तिथे जमलेली होती. ती हसत होती.

नंतर ती घरी आली. वाड्यावर आल्यावर बाहेर अंगणात खेळणारी मुले पाहून.

येसाजी, “ आर, ते बघा गाडीतून कोण उतरतय.”

तानाजी, “ काका न लगीन केलं वाटतं.”

कार्तिक, “ थोरली आई असल्यावर काहीपण घडू शकतं.”

आजी लक्ष्मीबाई, ( तानाजीस) “ बाळ , आत जा व आईला आरतीचं ताट घेऊन यायला सांग.”

तानाजीने आत निरोप दिला तेव्हा त्याची आई

आई, “ कशाला हवे ताट?”

तानाजी, “ तुमच्या जाऊबाई आल्यात त्यांना ओवाळण्यासाठी.”

त्या दोघी आश्चर्य चकीत होऊन.

“ काय?”

त्या दोघी बाहेर येऊन पाहून.

पार्वती, “ अगं बाई, खरंच की यांनी लग्न केलं.”

सरस्वती, “अगं बाई, माझी हौसच अपूर्ण राहिली, वाटतं होत. दिराच्या लग्नात तरी एखादी पैठणी मिळेल. पण म्हातारीनं गोंधळ घातला.”

पार्वती, “ नाहीतर काय? पाहुणे नाहीत, जेवण नाही, मांडव नाही. काही नाही. लावलं लगीन.”

 त्यांना दारापाशी घुटमळतं असल्याचे पाहून.

लक्ष्मीबाई, “ सापडतीया की नाही पंचारती, काय शोधायला पोलिस पाठवू.”

पार्वती, “आले घेऊन.”

“ चल ग.”

त्या दोघी आत जाऊन पंचारती व माप घेऊन आल्या. व औक्षण करताना

पार्वतीने नाक मुरडले. ते पाहून.

नणंद अलका, “ काय वहिनी नाक कुठे, तोंड कुठे, जरा नीट होऊ दे.”

पार्वती, “हूं….”

त्यांनी औक्षण करुन नवरा नवरीला आत घेतले.

……. ….. ……..

रात्रीची वेळ मल्हारी आपल्या खोलीत होता. उमा जेवणखोलीत होती. तिच्या जावा तिच्याकडे पाहून तोंड वाकडे करतात. ती कावरी बावरी झाली. इतक्यात त्या ठिकाणी अलका, वासवी व अवंतिका आल्या.

अलका, “ काय वाहिनी अशी काय बावरलीस.”

उमा, “ काही नाही. “

अलका, “ थांब, मी मदत करते.”

ती दूध घेऊन गरम करुन ग्लास मध्ये ओतून तिच्याकडे देते.

अलका, “ हा… चल…”

वासवी, “ अगं, अत्ती हे दूध कशासाठी?”

अलका, “ गप ग, सिनेमा पाहिला नाहीस का? नवरी नव्या नवऱ्याला अशी दूध घेऊन जाते मग…”

अवंतिका, “ ती नवऱ्याला दूध पाजते.”

वासव, “ दूध पिल्यावर काय करते?”

अवंतिका, “ लाईट बंद होते.”

वासवी, “ लाईट बंद केल्यावर.”

अलका, ( अवंतिकाच्या तोंडावर हात ठेवून) “ ते झोपी जातात. चल म्हातारे लई प्रश्न विचारू नकोस.”

अलका उमेच्या हाती दुधाचा ग्लास देते. व त्या तिघींजनी उमाला मल्हारीच्या खोलीपर्यंत सोडतात.

वासवी, “काकीला काकांच्या खोलीची वाट माहित नाही का”

खोलीचे दार उघडताच त्या पाहतात. तिथे मुले खेळत होती. व त्यांनी सर्व फुलांच्या माळा विस्कटलेल्या होत्या. अलका काठी घेऊन त्यांना पळवून लावते. व उमाला आत जायला सांगते. उमा आत जाताना अवंतिका व वासवी पण निघाल्या होत्या. त्यांना तीने मागे ओढले.

अलका, “तुमच काय काम आहे?”

वासवी, “काकाला दूध देते की नाही ते बघते की.”

अलका, “लई शहाणी आहेस चल. मागे.”

उमा आत गेल्यावर अलका दार बंद करुन त्या दोघींना ओढून

“चल गुपचुप तिकडे.”

त्या आपल्या झोपण्याच्या खोलीकडे गेल्या.

…. …….. ……



शुक्रवार, १९ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १८

 

अस्तित्व पटकथा भाग १८



अस्तित्व पटकथा भाग १८, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ......


उमा बाहेर आल्यावर तिथून पुढे गावातील लोकांच्या प्रश्नाचा ससेमिरा मागे लागेल. म्हणून मुलांबरोबर रानात गेली. तिथे मुले बॉलने खेळत होती. तिथेच शेजारून रस्ता गेलेला होता. खेळताना छोट्या महिपतीने बॉल मारला. तो थेट रानातील विहिरीत गेला. तेव्हा.

महादू, “ खाल्लस शेण, तुला हजारदा सांगितलंय जरा बॉल दमान मारत जा. आता गेला ना विहिरीत. आता काय तुझा आज्जा येणार आहे का काढायला?”

महिपती, “लई बोलू नकोस मी काढतो.”

श्रीपती, “ तोंड बघा बॉल काढणार्याचं. पोहता येतं का?”

महिपती, “काढतो मी.”

तो धावत गेला. काठीने बॉल काढू लागला. त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला.

मुले, “वाचवा, वाचवा, महिपती पडला.”

इतक्यात तिकडे रानात आलेली उमा जी झाडाखाली शांत बसली होती. ती आवाज ऐकून धावत गेली. विहिरीत उडी टाकली. त्याचवेळी मल्हारी व त्याचे आई वडील गाडीतून निघाले होते. मुलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाईनी गाडी थांबवण्यास सांगितली.

लक्ष्मीबाई, “ड्रायव्हर गाडी थांबवा. मल्हारी, धाव विहिरीकडे कोण पडलय बघ?”

मल्हारीने वेगाने दार उघडून धावत जाऊन विहिरीत उडी मारली. उमा महिपतीला शोधत होती. मल्हारीने बुडी मारुन महिपतीला पाण्याच्या बाहेर काढले. त्याचे पोट दाबून पाणी काढले. महिपती शुद्धीवर आला. त्यावेळी मल्हारीचे भिजलेल्या उमाकडे व उमाचे त्याच्याकडे लक्ष गेले. नजरा नजर झाली. उमा बाहेर विहिरीच्या पायरीवरून जाऊ लागली. मल्हारीने तिचा हात धरला. उमा हात सोडवून..

उमा, “आता काय काम आहे इथे. की दुसरं स्थळ पहायला निघालाय.”

मल्हारी, “ दुसर नाही, पहिलंच जुळवायला आलोय. “

उमा, “ घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करुन तोंडघशी पाडण्यापेक्षा आधीच नकार द्यायचा. उगाच कशाला घरी बोलवायचे.”

मल्हारी, “ अपमान कोणी केला. मी तर नाही.”

 इतक्यात लक्ष्मीबाई व सदाशिवराव तिथे आले. मल्हारी व उमाचे बोलणे ऐकून लक्ष्मीबाई, “कोण ग तू, व विहिरीत का उडी घेतलीस.”

मल्हारी, “काय करेल बिचारी, घरी आलेल्या स्थळांन नकार दिल्यावर.”

उमाने तिरकस नजरेने पाहिले. ….

लक्ष्मीबाई, “ म्हणजे?”

मल्हारी, “ हीच ती, तुझ्या मुलाच्या कपाळावर विटीचा प्रसाद देणारी, तुझी होणारी….”

लक्ष्मीबाई, “उमा का?”

तिच्याकडे पाहून

“ अगं, भिजलीस की, थांब हा.”

“अहो, आणा ती पिशवी इकडे.”

सदाशिवरावांनी पिशवी दिली.

लक्ष्मीबाई, “ हा, घे, ही साडी अन् नेसून ये.”

उमा बाजूला झाडीत जाऊन साडी गुंडाळून आली.

लक्ष्मीबाई, “आता चल बस गाडीत अन् तुझ्या वाड्याची वाट दाखव.”

मल्हारी, “ हे आपलं बरं हाय, इथे मी भिजल्याचे काही नाही. व सुनेचं कौतुक चाललय.”

लक्ष्मीबाई, “ ये, गप्प, चल ग बस.”

उमा गाडीत बसली. गाडी निघाली. थोड्याच वेळात उमाच्या अंगणात पोहोचली. सर्वजण उतरले. गणपतराव झोपाळ्यावरून पाहतात. उमा व मल्हारीस ओल्या अंगाने पाहून.

गणपतराव, “ अगं, ऐकलस का? बाहेर ये जरा.”

आतून शकुंतला बाहेर आली. उमाला भिजलेली पाहून.

शकुंतला, “ हे, ग काय भिजलीस कशाने?”

लक्ष्मीबाई, “ काही नाही विहिरीत एक पोरगं पडलं होतं. त्याला वाचवताना दोघे भिजलीत. त्यांना कपडे द्या बदलायला.

शकुंतला, “चल आत.”

ती दोघे आत गेला. उमाने आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. शकुंतलाने आपल्या नवऱ्याचे धोतर व सदरा जे ठेवणीतले होते. ते मल्हारीस दिले. त्याने कपडे बदलले.

तोपर्यंत बाहेर गणपतराव व आजी, सदाशिवराव व लक्ष्मीबाईशी गप्पा करत बसले होते.

गणपतराव, “आपण…”

सदाशिवराव, “ आम्ही मल्हारीचे आई बाबा आहोत. व लग्नाची बोलणी करायला आलो आहोत.”

इतक्यात शकुंतला आतून चहा घेऊन आली. ते सर्व चहा घेत.

शकुंतला, “ पण आपल्या घरातील इतर मंडळींना …..”

लक्ष्मीबाई, “त्याचं सोडा हो, लग्न कुणाला करायचं आहे. मल्हारीला , त्याला मुलगी पसंत आहे व आता आम्ही पहिली, आमचा पण होकार आहे. तुमचं मत सांगा.”

शकुंतला, “ पण ते फोटो, चिठ्ठी.”

लक्ष्मीबाई, “ हे बघा, मला पूर्वीच कल्पना होती. माझी मैत्रीण आहे या गावात. शिवण्णा कुंभाराची बायको. तिच्याकडून सगळं माहीत आहे, अहो, आपल्या मुली झाडावर चढतात, शाळा शिकतात, घर सांभाळतात, काय बिघडलं त्यात. धडपडतातच ना. मला तर बाई मऊ मांजरीण नाही आवडतं. माझ्या मल्हारीला उमा शोभून दिसेल. तुमचं मत सांगा.”

शकुंतलाने नवऱ्याकडे पाहून डोळ्याने इशारा केला.

गणपतराव, “ आमचा होकार आहे. आता द्याय घ्यायचं बोला.”

लक्ष्मीबाई, “ हे बघा आमच्याकडे देवाने भरपूर दिले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने काय घालाल ते घाला. नारळ मुलगी दिली तरी चालेल.”

आजी, “ मग बघता काय फोडा सुपारी.”

लक्ष्मीबाई, “ नुसती सुपारी नाही, लग्नच लावायचं बोला.”

उमाच लग्न ठरलं व तिचं व मल्हारीच लग्न लावलं गेलं.

……… ………. ……….

 क्रमशः पुढे .......












मंगळवार, १६ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १७

 

अस्तित्व पटकथा भाग१७,



अस्तित्व पटकथा, film story,marathi film story,marathi script,patkatha.,script,



 क्रमशः पुढे चालू 

इकडे कार्तिक शेतावर गेला. मल्हारी पाणी पाजत होता.

कार्तिक, ( ओरडत)

काका, काका.

मल्हारी पाणी पाजताना उभे राहून.

“काय रे काय काम आहे.”

कार्तिक, “तुला बघायल पाहुणे आलेत. चल घरला. काकीच्या घराकडील आहेत. कदाचित.”

मल्हारी, “ पुजारी काका बोलले नाहीत. बरं चल.”

मल्हारीने मोटर बंद केली. व आपल्या मोटारसायकली वरुन घरी निघाला. कार्तिकची सायकल बाजूला रानात ठेवली. व ते घरी निघाले.

….. ……. …….

दारात गाडी थांबली. बाहेर मुले बसली होती. अलका पण बाहेरून आली होती.

मल्हारी, “ चल लवकर.”

 येसाजी, “ काही उपयोग नाही. आता.”

मल्हारी, “ का काय झालं?”

अलका, “ वाहिन्यांनी सर्व मोडलं.”

मल्हारी, “ काय, अस का केलं?”

अवंतिका, “ हा, हे घ्या.”

( फोटो व चिठ्ठी तिने दिली. मल्हारीने ते वाचले. इतक्यात तिथे गाडी आली. लक्ष्मीबाई व सदाशिवराव खाली उतरले. त्यांना पाहून….)

 लक्ष्मीबाई, “आ, काय झाले. ही सगळी अशी का बसलेत?”

सदाशिवराव, “ झालं असेल काहीतरी, चल बघू.”

ते जवळ गेले.

लक्ष्मीबाई, “ काय झालं?”

वासवीने काकांच्या हातातील फोटो व पत्र दिले. लक्ष्मीबाई पाहू लागली.

अलका, “घरात दोन घरमोड्या असताना आणखी काय होणार. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कडव्या शब्दांनी केल्यावर काय होईल? मला वाटतं माझं सुद्धा असंच होईल. मला वाटतं दादाला व मला आयुष्यभर असंच बिन लग्नाचं रहावं लागणार की काय? कुणास ठाऊक.”

लक्ष्मीबाई,( फोटो पाहून) “ वा… मुलगी झाडावर चढते. म्हणजे बाग उतरण्याचा खर्च वाचला.”

येसाजी, “ अगं आजी, चिठ्ठी तरी बघ.”

लक्ष्मीबाई, ( चष्मा ठीक करत) “ काय मेल्याची भाषा, धड मराठी पण लिहिता येत नाही. काय तर म्हणे, मुलगी झाडावर चढते. उद्या ढगांवर चढेल. अशी आंबे चोर तुम्हाला आवडेल का?”

“ मेल्य ला धड लिहिता पण येत नाही. व मिळाली चिठ्ठी अन् लग्न मोडल. काय रे कुणी मोडल. मल्हारी तू”

कार्तिक, “ नाही, काका शेतावर होता. त्याला माहिती पण नव्हतं.”

कार्तिक, “ आई व काकी या दोघींना हे सगळं माहीत होतं. आलेल्या पाहुण्यांना त्यांनीच सगळं दाखवलं.”

लक्ष्मीबाई, “ पाहुणे कुठे गेले?”

 अलका, “ गेले त्यांच्या गावी, तुझ्या सुनांची बोलणी खाऊन.”

लक्ष्मीबाई, “मल्हारी जा आवरून ये.”

तो आत गेला.

सदाशिवराव, “ आता काय करायचं?”

लक्ष्मीबाई, “ काय म्हणजे लग्न.”

सदाशिवराव, “ तुला मान्य आहे हे.”

लक्ष्मीबाई, “ ही लक्ष्मी विचार करुनच पाय टाकते, मी त्या मुलीची सर्व माहिती काढलीय. मगच मल्हारीला पाठवून दिले होते.”

इतकयात मल्हारी आला. अलकाने हळद कुंकू व साहित्य आणून दिले. ते घेऊन मल्हारी ,लक्ष्मीबाई व सदाशिवराव गाडीत बसले व निघाले.

….. ……. ……

 गाडी आसगावात अंगणात थांबली. गणपतराव व शंकुंतला गाडीतून खाली उतरली.

पाय धुताना

आजी, ( ज्योत्याच्या खांबणीला उभा राहून) “ काय ठरलं.”

शकुंतला, ( पाण्याची चुळ भरत) “तुमच्या नातीने जे गावभर गुण उधळलेत ना, ते सगळीकडे झालेत. आंबे काढते, चिंचा काढते, मुलांना बदडते. ते सगळ गावभर झालंय.”

आजी, “ अगं, पण ते शाळेत असतानाचे उपद्व्याप पण माझी नात खट्याळ असली तरी गुणी आहे हो.”

शकुंतला, “ तेच खट्याळ गुण पहायला येणाऱ्यांना खटकताहेत. व परवाच्या स्थळाचं डोकं पण याच बयेनेच फोडलंय. “

इतक्यात उमा बाहेरून तिथे आली. तिला पहात,

शकुंतला, “ पाहिलत का, जरा कुठे बाहेर गेलं की ही मांजरीन लागली घर फिरायला. कुठं गेली होतीस?”

उमा, “काही नाही, जरा उकडत होतं . म्हणून बागेत गेले होते.”

शकुंतला, “झालं का उंदरासारख उंडरुन. चल घरात.”

तिच्या हाताला धरुन ओढत आत नेते. आवाज ऐकून शेजारी पाजारी वाकून पहात असतात.

गणपतराव, “उगाच दंगा नको. शेजारी पाजारी बघताहेत. ”

 शकुंतला, “ बघू देत. चल कारटे घरात. जन्मल्या आईला गिळून बसलीस. अन आता माझा जीव खातिया. नालायक, बाईच्या जातीनं कसं वेळूसारखं असावं. वेळ आली की नम्र रहावं. हिच मात्र निराळच.”

तीने पाठीत दोन धपाटे दिले.

आजी, “ उगाच गावच ऐकून बोलू नकोस. माझी उमा गुणाची हाय. माप एकापेक्षा एक स्थळ येतील चालून.”

शकुंतला, “आलेलं स्थळ सरसच होतं. पण हिच्या कारणाममूळे मोडल. आता बस म्हणावं एखादा नकटा बिकटा घेऊन”

आजी, “ माझ्या नातीच लग्न मोडणाऱ्याला देव पांगळं करु देत. मोडून ठेवू देत त्याला. बगळं उचलून टोचून खाऊ देत त्याला. मेल्यानं चांगल्या कामात खोडा घातला. येसीचा महादेव रगतपिती भरवील त्याला.”

त्यांचे बोलणे जगन ऐकत होता. तो आपले तोंड काळे करुन तिथून गेला.

उमा आतील खोलीत रडत होती.

आजी, “ ह.. सोड रडणं अन् जा बाहेर, मळभ जाईल मनावरलं, लग्नाचं काय? आजच उद्या होईल. त्यात काय विचार करायचा.”

उमा तिथून बाहेर गेली.

….. ……. ………. …..


रविवार, ७ जून, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १६

 

अस्तित्व पटकथा भाग १६

अस्तित्व पटकथा भाग १६, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

गणपतरावांकडे श्यामभट्ट आले. व त्यांची पसंती विचारायला.

श्यामभट्ट, ( अंगणात येत.)” पाटील आहित का?”

गणपतराव, “कोण? भटजी बुवा. या की.”

श्यामभट्ट पायरी चढून वर आले. बाकड्यावर बसले.

गणपतराव, “ अहो, ऐकलंत का? चहा टाका, भटजी बुवा आलेत.”

शकुंतलाने चहा गड्याकडून पाठवला व ती ही आली.

चहा घेत.

भटजी, “ बरं, काय ठरलं. तुमचं मागल्या स्थळाबद्दल.”

गणपतराव, “ उमा, काय सांगायचं स्थळाला.”

उमा, “ तुम्हीच ठरवा, मी काय सांगणार.”

शकुंतला, “ सांगा होकार. पण…..”

गणपतराव, “ पण काय आणखीन.”

शकुंतला, “ मी म्हणते, नवऱ्याच घर एकदा पाहिलं असतं तर…..”

गणपतराव, “जाऊ की.” ( पुजाऱ्यांकडे पहात.) “ काय म्हणता?”

 श्यामभट्ट, “ तर काय? जायलाच हवं. उमाला द्यायची म्हंटल्यावर, बरं मी तसं कळवतो.”

……. ………..

श्याम भट्टानी निरोप मधुकर पुजारी यांना दिला. की ते नवऱ्याचे घर पहायला येणार आहेत. म्हणून. दिवस ठरवून पुजारी बुवा वाड्यावर गेले. वाड्यावर सुनबाई पार्वतीकडे निरोप सांगितला. तिने घरातील बाहेर गेलेत. सांगेन असे सांगून तिने निरोप दिलाच नाही. शकुंतला, गणपतराव व श्याम भट्ट ठरल्यानुसार सूर्यगावला आले. त्यावेळी मल्हारी शेतावर तर लक्ष्मीबाई व सदाशिवराव शेजारील गावात देव दर्शनास गेले होते. अंगणात गाडी पोहोचली. वाळवण दारात घातलेलं होतं. बाहेर गोठ्यात जनावरांना शिवण्णा वैरण घालत होता.

शकुंतला, “ बाहेर कोणच दिसतं नाही. हेच घर ना, नाहीतर चुकीच्या घरात घुसायचो.”

श्याम भट्ट, “अहो, वाहिनी हेच ते घर. मधुकर पुजाऱ्यांच सांगण चुकायच नाही.”

गणपतराव, “अहो, पण पुजारी बुवा कुठे आहेत?”

श्याम भट्ट, “अहो, शेजारील गावी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तिथे अडकलेत ते. येतीलच थोड्या वेळात”

 इतक्यात शिवण्णा समोर येत.

शिवण्णा, “ कोण पाहिजे?”

श्याम भट्ट, “ मल्हारी सदाशिव पाटलांचं घर हेच ना.”

शिवण्णा, “हो, काय हवय.”

श्याम भट्ट, “ आसगावाहून पाहुणे आलेत. म्हणून सांगा . घर पहायला.”

शिवण्णा, “या की, पण मालक व मालकीण बाहेर गेलेत. व मल्हारराव शेतावर. “

कार्तिक व येसाजी तिथे जवळच खेळत होते. ते

कार्तिक, “शिवाकाका कोण आलंय?”

 शिवण्णा, “ आपल्या धाकल्या धन्यासाठी आलेत ते. घर पहायला.”

कार्तिक, “काय, काकांना पहायला.”

शिवण्णा, “हो.”

 कार्तिक, “येसाजी घरात सांग जा. मी काकांना बोलावून आणतो.”

कार्तिक सायकल घेऊन शेताकडे गेला. येसाजी घरात गेला. व त्याने आपल्या आईकडे निरोप दिला.

पार्वती, “अगं बाई, अहो जाऊबाई ऐकलत का, पाहुणे आलेत.”

सरस्वती, “हो, ऐकलं,” “ बर बाळ जा व तुज्या बाबांना व काकांना बोलावून अन् जा.”

शिवण्णा त्यांना आत घेऊन आला.येसाजीने बाबांना व काकांना बोलावले. व सरू नोकरांनीने पाहुण्यांना पाणी नेऊन दिले.

येसाजीचे बाबा फोन करत होते.

सरस्वती, “ कशाला फोन करताय. तुम्ही फक्त बाहेर बसा. आम्ही बघतो काय करायचं ते.”

जयसिंगराव, “ तुम्ही काय करणार आहात?”

सरस्वती, “ तुम्ही व प्रताप भाऊजी जाऊन बाहेर बसा. आम्ही आलोच फराळ घेऊन.”

जयसिंगराव व प्रताप बाहेर येऊन बसले. पाहुण्यांची चौकशी करू लागले. शिवण्णाने पाहुण्यांना पाणी दिले.

जयसिंगराव, “ घर शोधताना काही त्रास तर नाही ना झाला.”

श्याम भट्ट, “ नाही, मधुकर गुरुजींनी बरोबर पत्ता सांगितला होता.”

जयसिंगराव, “ बरं का हे आमचे बंधू प्रतापराव.”

गणपतराव, “ हा, हे काय करतात?”

इतक्यात पार्वती व सरस्वती काही फळे व सरबत घेऊन आल्या. ते ठेवत.

पार्वती, “ हे आमचे मिस्टर, कृषी क्षेत्रातील नामवंत संशोधक आहेत. सर्व शेती तेच पाहतात.”

सरस्वती, “ या वर्षी तर खूप धान्य पिकवलेय, ऊस, मक्का, तांदूळ, गहू, आमच्या बागा पण आहेत.”

गणपतराव, “ ते आहेच हो, पण तुमचे सासू सासरे कुठे दिसत नाहीत.”

पार्वती, “ते होय , अगं बाई , सांगायचंच राहीलं. ते होय शेजारील गावी देव दर्शनाला गेलेत. अन मल्हार भाऊजी शेतावर. तुम्ही येणार हे माहीत नव्हतं. नाहीतर थांबवलं असतं.”

 प्रतापराव, “बोलवायला गेलाय मुलगा , येईलच इतक्यात. बर तुमची मुलगी."

गणपतराव, “आमची उमा होय, फार गुणी आहे. सर्व घरकाम करते. व …….”

सरस्वती , “ ते माहिताय आम्हाला, घ्या की सरबत. तुमच्या मुलीची ख्याती सर्व गावभर आहे.”

शकुंतला, “ म्हणजे, मी नाही समजलो.”

पार्वती, “ म्हणजे काय, हो, घ्या की, तिला छान झाडावरील कैर्या काढता येतात, पाणी ओढते आडाचे, आंबे व्हळीत पिकत घालते. प्रसंगी मुलाना चेचते पण. सगळ माहित आहे आम्हाला.”

सगळे आवाक होऊन पाहू लागले.

सरस्वती, “ अहो चेष्टा केली, घ्या की.”

शकुंतलाने गणपतरावांच्या चेहऱ्याकडे पहिले.

पार्वती, “ आम्ही फोटो पण पाहिलाय.”

सरस्वती, “ हा थांबा ह.. मी दाखवते.”

तेव्हा तिचे मुलांसोबत खेळत्याले व झाडावरील आंबे काढत्याले फोटो सरस्वतीने दाखवले.”

ते पाहून ती तिघे उठलीत. व नमस्कार करुन निघालीत.

पार्वती, “ अहो, अहो, अस काय? चहा तरी घ्या.”

 जयसिंगराव, “ हे, अस बोलतात.”

 ती गाडीमध्ये जाऊन बसलीत.

गणपतराव, “ ड्रायव्हर गाडी चालवा.”

ड्रायव्हर, “ जी.”

गाडी निघून जाताना.

येसाजी, ( धावत गाडी जवळ येत. व त्यांना उद्देशून)

“ अस, जाऊ नका, आमचे काका लई छान आहे. सुखात ठेवतील काकीला.”

शकुंतला हसली व

“ ठेवेल हा पण …..”

 गाडी निघाली.

इकडे या दोघी एकमेकांना आपले अंगठे दाखवून वेल डन म्हणून हसू लागल्या.

……. …… …….

क्रमशः पुढे.....

शनिवार, ३० मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १५

 अस्तित्व पटकथा भाग १५


अस्तित्व पटकथा भाग १५ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,



क्रमशः पुढे चालू....

उमा बागेतील झाडाखाली बसली होती. शांतपणे विचार करत. तेथील शांततेने तिच्या अंतरंगात वेगळीच हालचाल जाणवत होती. तशी ती झाडाला टेकून बसली. तर वेगळीच शक्ती तिच्यामध्ये जागृत होत होती. व तिचा अल्लड स्वभाव शांत होत चाललेला होता. ती एकाग्र होत होती. इतक्यात पाठीमागून लपत छापत आलेला महादू तिला ‘भाव’ केला.

महादू, “घाबरली रे घाबरली.”

उमा, “ तुला वाटते का मी घाबरले असं.”

महादू, “ नाही.”

उमा, “ मग असं का म्हणालास?”

महादू, “ बर बाई, मी हरलो. एक सांग. तुला दाजीबा पसंत आहेत नव्ह.”

झाडावरून लोंबकलणारा व कैऱ्या तोडणारा अथर्व खाली येत म्हणाला, “ पसंत नसायला काय झालं. मस्त आहे. राजबिंडा, बुलेट चालवताना एखाद्या हिरो सारखा दिसतो.”

उमा, “तुला बरे माहिती, तू केव्हा पाहिलास.”

अथर्व, “ तू विटी मारलीस ना, तेव्हा पाहिलं. काय ती बुलेट, काय तो गॉगल, एकदम झ्याक दिसत होता.”

 शिरपा, “ पण उमाक्का तुला कशी पसंत केली तेनं.”

उमा, “म्हणजे? मी काय वाईट दिसते.”

शिरपा, “ एवढी विटी मारुन देखिल गडी शांतच कसा हा मला प्रश्न पडलाय बघ.”

महादू, “पसंत नसायाला काय झालं. आमची उमाक्का आहेच एका राजकुमारी सारखी. एखाद्या राजाला देखिल गुलाम बनविल.”

अथर्व, “काय ग, तू दाजीबाला गुलाम करणार?”

महादू, “गप्प लेका, तस म्हणायचं असतं. अस का कोण नवऱ्याला गुलाम करत होय.”

उमाच्या चेहऱ्यापुढे चहा देतानाचा मल्हारचा पाहिलेला चेहरा दिसू लागला.

….. ….. …..

उमाच्या लग्नाची बातमी गावात सर्वत्र पसरली. जगन पारावर बसलेला होता. तेथे गावातील दोन माणसे गप्पा मारत होती.

गोपाळ, “ काय सावजी पेरणीची तयारी कुठंपातूर आली.”

सावजी, “ आलीय आवरत, काल धाणनी, औत झालंय. आलय तयार होतं.”

धनाजी, “ गोपाळकाकानी नंबर मारलाय म्हणायचा.”

गोपाळ, “ केलंय तयार पण गावाबरोबरच टोकणनी करायची ठरलंय.”

इतक्यात तेथून श्याम भट्ट जाताना पाहून.

गोपाळराव, “ काय बुवा कसली गडबड चाललीय.”

श्याम भट्ट, “ पाटलाच्या उमाला स्थळ आलंय नव्हं. त्याच सारख वारख करायच चाललय.”

धनाजी, “ पाटलाची उमा लग्नाजोगी झाली.”

सावजी, “ मग काय, तिच्या बरोबरीच्या सर्व उजवल्या. हीच तेवढी राहिलीय.”

धनाजी, “ कुठलं स्थळ आलंय?”

श्याम भट्ट, “ सूर्यगावच्या सदाशिव पाटलांचा मुलगा मल्हारी. त्याच आलंय. पसंती झालीय. थोडीफार बोलणी करायची अन् उरकून टाकायचं.”

सावजी, “बर हाय की.”

श्याम भट्ट, “ येतो मग.”

गोपाळराव, “ हा चालेल.”

पारावर बसलेला जगन त्याचं बोलणं ऐकतो. तो आपल्या मनात….

जगन, ( मनात) “ उमीच लगीन काय? बघतोच कशी लग्न करते ते.”

तो तिथून उठला. व शंभू माळ्याच्या घरी गेला. शंभू माळी ओसरीतल्या पाळण्यावर बसलेला होता.

जगन, “ राम, राम, माळी काका.”

शंभू माळी, “ कोण जगन, ये… ये… बस. काय काम काढलस.”

जगन, “ काय काका, नाही म्हटलं तर तुमच्या कानावर बातमी आलीच असेल की.”

शंभू माळी, “ बातमी, ती आणि कोणती?”

जगन, “ अहो, ती नाही का गणपत पाटलाची पोरगी उमी. तिचं लगीन ठरतंय म्हणे.”

शंभू माळी, “ काय? उमीचं लगीन, ते अन् कुणाशी?”

जगन, “ आव ते सुर्यगावचं आहे ना पोरग. कोण ते हा मल्हारी की फिल्लारी हाय., हा त्याच्याशी ठरतंय._

शंभू माळी, “मग ठरू दे की, त्यात काय एवढं, वयात आलेल्या पोरी उजवून इकडून तिकडं अन् तिकडून इकडं जायच्याच.”

जगन, “अहो काका, तिनं एवढं तुमच्या बागेचं नुकसान केलं, अन् तुम्ही तिला अशी सोडणार.”

 शंभू माळी, “ मग काय करायचं म्हणतोस.”

 जगन, “ हा कान करा इकडं.”

जगन शंभू माळ्याच्या कानात कुजबुजत.

शंभू माळी, “अस म्हणतोस.”

 जगन, “ पण त्यासाठी खर्चापाणी लागलं, मग देताय ना, पाचशे रुपये.”

 शंभू माळी, “ बर… देऊया की, माझ्या आंब्याच्या झाडाच्या एका एका आंब्याचा बदला घ्यायचाय मला. हा थांब.”

शंभू माळी उठला. त्याने आपले फडताळ उघडून त्यातील डब्यातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढून जगनला दिल्या. जगन पैसे घेऊन निघून गेला.

जगन जातच शंभू माळ्याची बायको आतून बाहेर आली.

शंभू माळी बायको, “काय हो, तो जगन्या कशाला आला होता?”

शंभू माळी, “ आलता काम होतं एक.”

बायको, “ मला माहिताय कसलं काम ते. उगाच चढता वेल कापू नका. नाहीतर आपला कुजल. हा सांगते. उगाच नसत्या उठाठेवी कशाला हव्यात. जर त्या पाटलाला अन् पाटलीनीला कळलं तर तो पाटील टांगेल आसगावच्या वेशीच्या बावीवर, अन् पाटलीन देईल मिरचीची धुरी मग समजल.”

शंभू माळी, “कळेल तेव्हा कळेल, तू तेवढी गप्प रहा म्हणजे झालं. बघतोच मी, माझं आंबे उतरते काय. चढ म्हणावं झाडावर, अन् खा आंबे.”

……………. ……… ………..

जगन आंतरदेशीय पत्र घेऊन त्यामध्ये उमेविरूद काही बाई लिहून घेऊन सूर्यगावला सायकल घेऊन गेला. वाड्याच्या बाहेर अंगणात शिवण्णा नोकर लाकडे फोडत होता. जगन पोस्टमन होऊन तिथे गेला.

जगन, “ पोस्टमन, पत्र घ्या.”

शिवण्णाने लाकडे फोडायची थांबवून पत्र घेतले. व आत नेऊन थोरल्या सुनेच्या हातात दिले.

शिवण्णा, “बाईसाब हे घ्या पत्र आलंय कुणाच?”

पार्वतीने पत्र घेतले. व ती जेवण खोलीत आली. सरस्वती तिथे भाजी नीट करत होती.

सरस्वती, “कुणाच ग पत्र.”

पार्वती, “ अगं, बाई यावर तर पत्ता दिसत नाही. फक्त मल्हारीस अस लिहिलंय.”

सरस्वती, “ आण बघू, काय लिहिलंय बघू.”

“ अग खरंच की असं नाव लिहिलंय म्हंटल्यावर काहीतरी भानगडच असणार.”

पार्वती, “ कसली भानगड?”

सरस्वती, “ थांब , फोडून बघते.”

सरस्वती पत्र फोडून वाचले. व आवाक होऊन.

पार्वती, “काय हाय ग पत्रात.”

 तिने तिच्या हातातील पत्र घेऊन वाचले.

पार्वती, “ चल, मस्त संधी आलेय. जाऊन सांगूया.”

सरस्वती, “थांब, आता नको, बरोबर मोक्यावर घाव घालायचा.”

पार्वती, “ म्हणजे?”

सरस्वती, “ म्हणजे वाघाचे पंजे, कान कर इकडे.”

तीने तिच्या कानात काहीतरी सांगितले.

……… ……….. …………




मंगळवार, २६ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १४

 अस्तित्व पटकथा भाग १४


अस्तित्व पटकथा भाग १४ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

मल्हारी घरी आला. वाटेत येताना मधुकर पुजारी काकांना सोडून तो वाड्यावर आला.त्याने आपली बुलेट पार्क केली. व हौदाला हात पाय धुवू लागला.

मुले त्याच्याभोवती ‘काका आला.’ असे म्हणत गोळा झाली. त्यांनी एकमेकांना खाणाखुणा केल्या.

वासवीने इशारा करुन कार्तिकला विचाराय सांगितले.

मल्हारी, “ बोला, काय हवय.”

तानाजी, “ काकी कशी आहे?”

मल्हारी, “ अरे, आता तर पाहिलेय. बघू.”

कार्तिक, “ पाहिलीय ना, मग सांग दिसाय कशी आहे ती?”

मल्हारी, (तोंडाचा चंबू करुन आकाशाकडे पाहत.) “आहे बरी.”

वासवी, “ बरी म्हणजे कशी माझ्यासारखी आहे का?”

मल्हारी, “ आहे साधारण.”

अवंतिका, “ बरी आहे, साधारण आहे. हे सोड. सांग आपल्यात कुणासारखी दिसते.

मल्हारी, “ सांगू, आपल्या सरू सारखी.”

 मुले एकदम, “काय सरू सारखी.”

येसाजी, “ मग नकार कळंव.”

मल्हारी, “ ते माझ्या हातात नाही.”

अवंतिका, “ का?”

मल्हारी, “ आई साहेबांची पसंती. मी काय बोलणार.”

येसाजी, “ हे बघ, आम्ही मोठ्या आईला समजावून सांगतो.

पण आम्हाला काकी देखणी व हुशार हवी. आई व मधल्या काकी पेक्षा. सांगून ठेवतो.”

तानाजी, “ अन् हो मला हवे ते करुन घालणारी पाहिजे.”

अवंतिका, “ अन् माझी वेणी घालणारी व गजरा विणून देणारी हवी.”

वासवी, “ तुम्हाला काकी हवी की नोकरानी.”

सर्वजण, “ अपकोज काकी.”

वासवी, “ हे बघ तुला पसंत आहे का?”

मल्हारी, “ मला कोण विचारतं.”

येसाजी, “ लग्न तू करणार आहेस. की थोरली आई.”

इतक्यात मल्हारीचे आई वडील बाहेर आले. मल्हारी पाया पडला.

आई लक्ष्मीबाई, “ औक्षवंत हो.”

लक्ष्मीबाई, “ बर मुलगी कशी वाटली.”

 मल्हारी लाजत.

लक्ष्मीबाई, “ अरे, बोल की, पसंत आहे की नाही.”

 मान डोलावून होकार सांगु लागला.

लक्ष्मीबाई, “ उगाच नंदीबैल होऊ नको. स्पष्ट सांग. हो की नाही.”

मल्हारी, “ एवढं कळत नाही तुला. पसंत आहे.”

सदाशिवराव, “ अर्धी पसंती झाली. आता तिकडून होकार आला म्हणजे झालं.”

लक्ष्मीबाई, “होकार न यायला काय झाले. माझा मल्हारी आहेच मुळी लाखात एक. बघा येते की नाही खुशखबर.”

लक्ष्मीबाई, “मग, उभारणार म्हणा बोहल्यावर.”

मल्हारी, “हो.”

 तो आत जात होता. मुले त्याच्याकडे रागाने बघत होती.

येसाजी, “मघापासून आम्हाला खुळ्यात काढत होता. अन् मोठ्या आईपुढे बघितलस ना.”

अवंतिका, “आता काका आपला राहिला नाही.”

तानाजी, “अस का?”

अवंतिका, “खुळं लावलं काकीन.”

वासवी, “म्हणजे काकी दीसायला मस्त असणार.”

….. ……….. …..

आतमध्ये जेवण खोलीत

सरस्वती, “ काय ग कशी असेल, येणारी जाऊ?”

पार्वती, “ कशी पण असेना, आपल्या हाताखाली राबणारी हवी.”

सरस्वती, “ असेल का तशी.”

पार्वती, “ नसली तरी करुन घ्यायची.”

इतक्यात ननंद अलका तिथे आली. डेर्यातील पाणी घेऊन पिऊ लागली. पिऊन झाल्यावर…

अलका, “ काय वाहिनी कसली बोलणी चालल्यात.”

सरस्वती, ( मुरका मारत) “ नाही म्हटलं, भाऊजींच आज ना उद्या होईलच. आमच्या नंदुबाईना एखादा पृथ्वीराज घोड्यावर बसून कधी घेऊन जाईल.”

अलका, “एवढं काही वय झालं नाही हा माझं. आता कुठ अठरा लागलंय.”

पार्वती, “तरी म्हंटल, एखादा घरजावई तरी करुन घेतलेला बरा.”

 अलका, “काय, घर जावई.”

सरस्वती, “ नाहीतर काय, तू तर घरातील काम करत नाहीस. सासरात कसं व्हायचं तुझं.”

अलका, “ त्याची तुम्ही काळजी करू नका. माझं मी पाहून घेईन. अन तुमच बघा. नाहीतर येणारी वाघीण असली तर तुम्ही शेळ्या कोणत्या कोंडवाड्यात जाऊन बसशीला ते बघा. माझ्या लग्नाचं बोलत्यात. निम्या वयाच्या झाल्या. यांना साध्या भाकरी भाजता येत नाहीत.”

 ती बाहेर गेली. दाराशेजारी उभा राहिली.

पार्वती, “बघितलस ना, कशी बोलते. हिला चांगला चेचणारा नवरा मिळायला पाहिजे.”

सरस्वती, “तर काय, इथ आल्यापासून नुसती मोलकरीण करुन ठेवलीय.”

 बाहेरून अलका, “मला कसला ही नवरा मिळू दे, माझं मी बघीन. तुमची कामे आटपा नाहीतर आईला सांगून गोठा झाडायला लावीन. मी म्हणून तुमच्या चुकांवर पांघरूण घालते. नाहीतर… कवाच घरातल्यांनी हाकलल्या असत्या.”

सरस्वती, “बघितलस कशी सापाच्या कानाची आहे ते.”

पार्वती, “तर काय. आटप बाई. नाहीतर काय खरं नाही. ती सरी कुठं कलमडली. देव जाणे. इथं भाकरी करायच्या हाईत.”

पार्वती, “सरे, ये सरे.”

बाहेरील खोलीतून

सरू, “ हा, आले आले.”

……… …….. ………




शुक्रवार, २२ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १३

 अस्तित्व पटकथा भाग १३ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे......

पाटील, “ या बसा.”

मल्हारी, श्यामभट्ट व मधुकर पुजारी सोफा सेटवर बसले.

गणपतराव, “ डोक्याला काय लागले.”

पुजारी, “ मघाशी येताना वाटेत मुलांनी विटी मारली.”

गणपतराव, “ अस होय. “

आतमध्ये डोकावत,

“ अहो, ऐकलंत का? चहा पाण्याचं काहीतरी बघा. उमा आहे ना घरात.”

शकुंतला, “ हो आलीय,”

शकुंतलाने गड्याकडून पाणी बाहेर पाठवले. उमा साडी नेसत होती. राजश्रीची आई पोहे करण्यास मदत करत होती.

उमा, “ आजी, हे काय लगेच? तू तरी सांग.”

आजी, “ मी काय पिकलं पान, माझं कोण ऐकणार.”

बाहेरील बाजूस मधुकर भटजी ओळख करून देत.

मधुकर पुजारी, “ हा आमच्या गावच्या पाटलांचा मुलगा मल्हारी, बी.ए. सी. अँग्रीकल्चर आहे. भरपूर शेती आहे. त्यात नवनवीन प्रयोग करत असतो. याला दोन मोठे भाऊ विवाहित आहेत. मागे मंदिरात तुमच्या मुलीस पहिली. तेव्हा श्याम भट्टांकडे बोललो होतो.”

गणपतराव, “ हो बोलले होते शाम भट्ट मला. मला ही एक मुलगा व एक मुलगी आहे.”

गणपतराव, ( पत्नीस) : नाष्टा पाण्याचं काही बघताय की नाही.”

शकुंतला, “ हो झालंच.”

गड्याकडून शकुंतला नाष्टा लावून देते. उमा साडी नेसून तयार झाली.

आजी, “ बघू कशी दिसते.”

मायेने बोटे कपाळी नेऊन मोडली.

उमा, “ जड झालो व्हय, लगेच लग्नाचं बघायला.”

शकुंतला, “ मग काय बियाण्याला कनुगल्यात ठेवायची. उपवर मुलीचे हात पिवळे झालेले बरे.”

उमा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. चहा देताना मल्हारीने ओळखले. ती चहा खाली मान घालून देऊ लागली. व दिल्यावर तिने वर पाहिले. ती दचकली, काळजात धस्स झालं. मल्हारी मात्र तिला पाहतच होता.

मधुकर भट्ट, सावध करत.

“ काय मल्हारी, बघून घे, मुलगी पसंत आहे का बघ.”

मल्हारीने हसून चहा घेतला. भटजी बुवांनी उमाला औपचारिका प्रश्न विचारले.

“ बाळ नाव काय?“

“ उमा गणपतराव पाटील.”

“ शिक्षण “

“ H.s.c. सायन्स.”

“ छंद “

ती काही बोलत नाही.

आजी, “ तिला सर्व काही येते. जेवण, घरकाम, वगैरे ती सर्व करते. दारातील रांगोळी देखील तिनेच काढली आहे.”

मधुकर पुजारी, “ बरं.”

श्याम भट्ट, “ मल्हारी काय विचारणार आहेस का?”

मल्हारी, “ नाही, नको.”

( त्याने तिच्याकडे पाहून स्माईल केले. उमा शांत होती. तिच्या मनात धाकधूक होती. अनेक प्रश्न मनात येत होते.”

उमा ( मनात ) : “ त्याने मला पाहिलं तर नसेल ना. माझी तक्रार तर करणार नाही ना? दिसावयास छान आहे. पण स्वभाव कसा असेल? देव जाणे. मला पसंत करेल का? नक्कीच नाही, कारण मी विटी मारली ना? अरेरे, बिचाऱ्याच्या डोक्याला लागलं. रक्त किती ओघळले असेल. तरी पण हा शांत कसा? याने मला पाहिलं ना? मग तक्रार कशी करत नाही. हा घरी आहे ना आमच्या. सांगेल नंतर नकार. खरंच का मला नकार देईल? की होकार. बापरे, देवा तूच मला वाचव या संकटातून.”

श्याम भट्ट, “ बर, बाळ जा आत.”

उमा ने वाकून नमस्कार केला. व आत गेली. परसदारी असणारी मुले खिडकीतून वाकून पाहून परसदारी आली. चर्चा करुन त्यांनी चिठ्ठी लिहिली.

थोड्या वेळाने मधुकर भट्ट, श्याम भट्ट व मल्हारी बाहेर पडले.

गणपतराव, “ बरं काय ते निरोप कळवा.”

 मधुकर पुजारी, “हा कळवतो.”

 मल्हारी वाडा, रांगोळी, परिसर पहात जात होता. एक मुलगा बोळातून आला. व मल्हारीस चिठ्ठी देऊन गेला. व सॉरी म्हणाला. मल्हारीने ती चिठ्ठी घेतली. व वाचू लागला. त्यात लिहिले होते.

मल्हारीने चिठ्ठी उघडून पहिली. त्यात खालील मजकूर होता.

“ आमची उमाताई खूप चांगली हाय. आम्हाला ती विटी मारायला शिकवत होती. तेव्हा ती विटी लागली. माफ करा. ती खूप चांगली आहे. आम्हाला चिंचा देते. आंबे काढून देते. आमचा अभ्यास घेते. पुरणपोळ्या छान बनवते. तुम्ही पाडव्याला या. आम्ही मस्त पुरणपोळ्या वाढू….. तुमचा गुन्हेगार म्हाद्या”

मल्हारी हसला. त्याने ती चिठ्ठी खिशात घातली. व निघाला. वाटेत जाताना गाडीवर

मधुकर पुजारी , “ काय मल्हारी, मुलगी पसंत आहे का?”

मल्हारीने होकारार्थी मान हलवली.

मधुकर पुजारी, “ शाम भट्ट मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीकडच्या लोकांनाही विचारून घ्या. मग बघू पुढच.”

 श्याम भट्ट, “चालेल, विचारतो त्यांना. देईन निरोप नंतर.”

मधुकर पुजारी, “चालेल. निघतो आम्ही.”

ते निघाले.

….. ….. …

मुलगा पाहून गेल्यावर उमाने सुटकेचा सुस्कारा टाकला. पाटीमागे घराच्या मुलांची कुजबुज चालू होती.

 शकुंतला आत आल्यावर

“ मला तर बाई मुलगा पसंत आहे.”

 आजी, “ तुला असून काय करायचे? तिला आहे का बघ. तूला नांदायला जायचं आहे थोडंच?”

शकुंतला ने इशारा केला. उमा कावरी बावरी झाली. तिला काही सुचत नव्हते. ती काहीच बोलली नाही. इतक्यात गणपतराव आत आले.

गणपतराव, “ मला तर मुलगा बरा वाटला. अगदी राजबिंडा आहे. अन् कष्टाळू ही आहे.”

आजी, “ पण त्याला पसंत आहे का? हे कळायला हवं.”

गणपतराव, “ पसंत असेल, असं मला तरी वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरून जाणवलं.”

शकुंतला, “ उमाला पसंत आहे का विचारा.”

आजी, “ काय ग, तुला पसंत आहे का?”

उमा विचारात असते. तिला हलवत.

उमा, “ ह.. हो आ…”

आजी, “ ह. हो. आ… काय? पसंत आहे का?”

उमा, “ त्याला पसंत आहे का? हे आधी विचारा.”

आजी, “ तुझं काय ते सांग?”

शकुंतला, “ एवढं चांगलं स्थळ पुन्हा मिळेल का?”

उमा, “ आधी तिकडून येऊ दे निरोप मग बघू.”

बाहेर मुलांचा गोंगाट चालू होता.

शकुंतला, “ उमा, त्या भांड्यात पोहे आहेत. दे जा त्या मुलांना एक एक घास. कारवानं नुसती काल काल करताहेत.”

उमा ने उठून भांड्यातील पोहे एका पितळीत घेतले. व बाहेर गेली व मुलांना वाटू लागली. मुले ‘मला दे, मला दे’ असा दंगा करू लागली.

उमा, “अरे, दंगा करु नका. ओळ करा सर्वांना देते.”

पोहे घेतल्यावर. महादू तिच्या जवळ गेला.

महादू, “उमक्का काळजी करु नकोस. दाजी होकार देतील.”

उमा, “ ए म्हसोबा, गप्प, अजून कशात काय, अन् फाटक्यात पाय. उगाच लगेच नाती जोडू नकोस. मला तर तो नकारच देईल असं वाटतंय.”

महादू, “ गप्प बस, बघ होकार येतो. की नाही. मी चिट्टी दिलेय दाजीला. फडतळातून कागद अन् शाई घेऊन.”

उमा, “काय, चिठ्ठी, आई गं, मेलो आता. काय लिहिलंस त्यात.”

 महादू, काही नाही ग, फक्तं एवढंच लिहिलं. आमची उमाक्का लई चांगली हाय. अन् चुकून इटी लागली. माफ करा. म्हणून..”

उमा, “ एवढं सगळं लिहिलंस.”

इतक्यात मागील श्रीपती, “ एवढंच नाही. तर पाडव्याला या म्हणालाय. पुरणपोळी खायला.”

उमा, “ अरे, माझ्या कर्मा, तू तर पुरावाच दिलास की हातात. आता सगळ अंगलट येणार.”

महादू, “ गप, येईल निरोप.”

इतक्यात गडी बाहेरुन आला.

गडी, “ मालक, मालक, श्यामभट्टानी सांगावा दिलाय.”

गणपतराव, “ काय म्हणाले?”

गडी, “ मुलग्याला मुलगी पसंत आहे म्हणाले.”

गणपतराव, “ वा, खूप आनंदाची बातमी दिलीस.”

पाळण्यावर बसून झोके देत.

 गणपतराव, “ अहो, ऐकलंत का?”

शकुंतला, “ काय ते?”

गणपतराव, “ मुलाला मुलगी पसंत आली.”

शकुंतला, “ देव पावला म्हणायचा.”

गणपतराव, “ लाडू वळायला घ्या आता.”

शकुंतला, “ ते तर झालंच. पण आपणही त्याचं घर पहायला हवं.”

गणपतराव, “ ते तर होईलच हो.”

शकुंतला, “ उमा, ये उमा.”

 उमा, “ ओ.. , आले.आले.”

शकुंतला, “ आले काय आले. होकार आलाय तिकडच्या स्वारींचा. आता तुझं काय ते सांग.”

 उमा, “ काय लगेच.”

शकुंतला, “लगेच काय लगेच. मग काय महिना लावायला पाहिजे होता.”

उमा, “तस नाही.”

शकुंतला, “ तस वस काय नाही. गुमान हो म्हण. आणि उभी रहा बोहल्यावर.”

मुले, ( ओरडत) “ ऐ..उमा ताईच् लगीन ठरलं.”

उमाच्या हातातील पोह्यांची पितळी हिसकावून घेऊन नाचू लागले.

उमा,( मनात) “मला लगेच कशी पसंत केली याने. मी एवढी विटी मारुन देखिल.”

 ती विचार करु लागली.

……… …………………

क्रमशः पुढे.......



सोमवार, ११ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १२

 

अस्तित्व पटकथा भाग १२ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

दुपारची वेळ मल्हारी गाडीवरून आसगावच्या हद्दीत रस्त्याने पुजारी काकांना घेऊन निघालेला होता. वाटेत पुजारी बुवांना लघुशंका आली म्हणून त्याने बुलेट थांबवली. पुजारी काका बाजूला उतरून रानात गेले. इतक्यात एक रस्त्याच्या बाजूच्या मोकळ्या शेतात मुले चिन्नी दांडू खेळ खेळत होती. पाटलाची उमा एका लहान मुलास चिन्नी कशी मारायची ते शिकवत होती.

उमा , “ये वेड्या बघ कशी चिन्नी मारायचं ते. साधी चिन्नी मारता येत नाही. नेमबाज कसा व्हायचचास. थांब मी दाखवते.”

तिने दांडू काढून घेतला व चिन्नी मारली. ती बुलेट वरून निघालेल्या व वाटेत पुजारी काकांना लघुशंका आली म्हणून थांबलेल्या मल्हारीस लागली.गेली,

 मल्हारी, “आई ग.”

 इतक्यात चिन्नी पकडायला गेलेल पोर, “अरे , पळा पळा, चिन्नी लागली वाटतं.”

 उमा, “ बापरे, हे काय झालं. पळालेल बर नाहीतर काही धडगत नाही.”

मल्हारी, “ ये, थांब.”

मल्हारीने डोक्यावर लागलेल्या ठिकाणी रुमाल लावला.

उमाने पळताना मागे वळून पाहिले. मल्हारी व तिची नजरा नजर झाली. ती व मुले पळून गेली. पुजारी लघुशंका करुन आले.

पुजारी, “अरे रे, चिन्नी लागली वाटतं.”

मल्हारी , “जास्त नाही, थोडी लागली.”

पुजारी, “नाही कसं रक्त आलेय. चल शामभट्टाकडे गेल्यावर पाहू.”

 ते गावात आले. देवळा जवळील घरात शाम भट्टांकडे आल्यावर.

पुजारी व मल्हारी घरात गेले.

शाम भट्ट, “अरे, काय लागलं.”

पुजारी, “वाटेत मुले खेळत होती. चिन्नी लागली.”

शाम भट्ट, “ ही मुले पण ना, गावात गोंधळ घालून देवळाजवळ खेळून खापर्या घराच्या व देवळाच्या फोडतात. म्हणून रानात पिटाळली तर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची डोकी फोडत आहेत.”

श्याम भट्ट, “ अगं, जरा हळद आण.”

मल्हारी, “ नको कशाला, जास्त लागलं नाही.”

श्याम भट्ट, “ नाही कसं, रक्त ओघळत आहे. थांब…”

श्याम भट्टांची पत्नी हळद घेऊन आली. ती कपाळावर थोडी लावली. चहा पाणी झालं

मधुकर पुजारी, “ चार दिवसापूर्वी पाहिलेल्या मुलीच्या स्थळाच काय झालं.”

 श्याम भट्ट, “ आहे की थांबा आधी कल्पना देऊन येतो.”

श्यामभट्ट पाटलाच्या वाड्यावर गेले.

श्यामभट्ट , “ पाटील आहेत का?”

आतील खोलीतून पाटील व शकुंतला व आजी बाहेरील ज्योत्यावर आलीत.

गणपतराव, “ बोला, श्याम भट्ट, काय म्हणताय.”

श्याम भट्ट, “ अहो परवा बोललो होतो ना एका स्थळाबद्दल मंदिरात.”

 गणपतराव, “ काय झालं त्याचे.”

 श्याम भट्ट, “ तो मुलगा आलाय पहायला.”

गणपतराव, “ काय अचानक.”

 श्यामभट्ट, “ अहो, कालच तुम्ही म्हणाला होता ना, चालेल म्हणून.”

गणपतराव, “ बर, बोलवा त्यांना.”

 गणपतराव, ( शकुंतलास) “ अहो , उमा कुठाय?”

 शकुंतला, “असेल इथेच कुठेतरी.”

आजी, “ एवढी काय घाई लागलेय पोरीला द्यायची. अजून लहान आहे ती.”

शकुंतला, “ गप्प बसा, तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होऊन संसाराला लागल्या त्या. “

आजी, “ आणखी एक दोन वर्षे राहिली असती.”

 शकुंतला, “ तिचं काय लोणचं घालायचं आहे.”

श्याम भट्ट, “काय सांगू?”

गणपतराव शकुंतलाकडे पहात.

शकुंतला, “थोड्या वेळानं घेऊन या. तयारी करते.”

 गणपतरावांनी नजरेने इशारा केला.

शकुंतला आपल्या लहान मुलास

शकुंतला, “ बाळ जा, उमा ताई कुठे असेल तिथून बोलावून आण.”

तो धावत रानाकडे गेला. मुले एका झाडाखाली बसली होती. उमा झाडास उभा होती.

महादेव, “ कशाला एवढ्या जोरात मारलीस डोचकं फुटलं नव्ह त्याचं.”

उमा, “ मला काय माहित त्याला लागेल ते?”

महादेव, “ हा शिरप्या काय खोट सांगतोय व्हय.”

शिरपा, ( उठून) “ तर कसली जापून लागली, रगात आलं बिचाऱ्याला.”

उमा, “ लई लागली व्हय रं.”

शिरपा, “ तर काय एवढी खोप पडली, रक्तं गळंल भळभळा. माहिताय का?”

उमा, “ खरंच, देवा वाचव रे.”

 अथर्व, “ उगाच, शिरपा काय पण सांगू नको, तुझं माहिताय आम्हाला हातभर लाकूड अन सहा हात ढलपी असते. “ “गप ग, उगाच टेन्शन घेऊ नको. जर वेळ आली. तर मी अंगावर घेईन तुझा आरोप.”

शिरपा, “ म्हणं मी घेईन, लेका दांडू तरी धरायला येतो का”

महादेव, “ये गप्प आता, उगाच कालवा नको. काही झालं तरी आपल्या उमक्काला वाचवलं पाहिजे. तिचे किती उपकार आहेत आपल्यावर, किती पेरु, बोरं, कटक्या, चांगुण्या तीनं दिल्यात. गाभुळल्या चिंचा तर कितीतरी वेळा काढून दिल्यात तिनं.”

मुले, “ होय, खरं हाय.”

इतक्यात उमाचा भाऊ तिथे ओरडत पळत आला. धापा टाकत

भाऊ सुशांत, “ उमाक्का , उमाक्का”

महादू, “ काय झालं रे एवढं पळायाला. कुत्रा माग लागलाय का?”

सुशांत, “ उमाक्काला आईनं बोलावलय. अर्जंट काम हाय.”

शिरपा, “ शकुंतला काकीनी बोलावलंय म्हणजे झालं. वाड्यावर बातमी पोचली वाटत.”

उमा कावरी बावरी झाली.

महादू, “ वेळ आली तर मी सांगतो. मी मारली इटी म्हणून.”

शिरपा, “ पण त्याने विटी मारताना पाहिलंय ना तिला?”

महादेव, “ बघू चल काय झालंय ते, सगळ्या खेळाचा सत्यानाश झाला.”

तोपर्यंत आणखी एक मुलगा धावत आला.

मुलगा, “ ताई, ताई चल बोलावलंय तुला.”

 उमा लगेच घरला निघाली. पाठीमागून मुले चालली. वाटेत त्यांना तिने थांबायला सांगितलं. तरी देखील ते तिच्यामागे निघाले. दबक्या पावलांनी उमा परस दाराने ती आत घरात आली. मुले थोड्या अंतरावर उभा राहिली. शकुंतलाने त्यांना स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून पाहिले.

शकुंतला, “आली वानर टोळी.”

 दरवाजाजवळ जात उमास..

 शकुंतला, “ झालं उंदरा सारखं उंडारुन, मग हात पाय धू. अन् नेस ती साडी.”

शकुंतला मुकाटपणे साडी उचलून. व आतील दालनात गेली. मुले तिथे येऊ लागल्यावर.

शकुंतला, “ थांबा तिथंच, तुमच काय काम, बसा तिकडे ओट्यावर. नंतर बघते तुम्हाला.”

ती मुले शांतपणे ओट्यावर एकमेकाकडे पहात बसली. श्यामभट्ट व मधुकर पुजारी अन् मल्हारी वाड्यात पुढील दराने आले. आत येताना वाडा बारकाईने न्याहाळत मल्हारी आत आला.

क्रमशः पुढे........


गुरुवार, ७ मे, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ११

 अस्तित्व पटकथा भाग ११ अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


मल्हारी ( मनात) , “ खरंच, ती काळी असेल. असली तर. असूदे बघू.”

पाठीमागून धप्पा घालत मुले तिथे आली.

कार्तिक, “ काका , कसला विचार चाललाय?”

अवंतिका, “ कसला म्हणजे काकींचा, आणखी कोणाचा?”

येसाजी व तानाजी, “ काय खरंच.”

अवंतिका, “ मघाशी मी खांबा अडून ऐकलं, मघाशी मोठी आई, आजोबा अन् पुजारी काका बोलत होते.”

येसाजी, “ मग, ही तर आनंदाची बातमी आहे. त्यात काय झालं एवढं उदास व्हायला.”

अवंतिका, “ उदास होतील नाहीतर काय, मघाशी आई व लहान काकी बोलत होत्या. की कोळशाची खाण येणार आहे म्हणून.”

कार्तिक, “ म्हणजे, मी नाही समजलो.”

अवंतिका, “ अरे, वेडा रे वेडा, एवढं समजत नाही, काकी काळी आहे ना, म्हणून टोमणा मारत होत्या, काकांना.”

कार्तिक, “ काळी असली म्हणून काय झालं.”

येसाजी, “ गुण चांगले असले म्हणजे झालं.”

अवंतिका, “ पण मला माहितीये काकी कशी आहे ते.”

काका, “ काय, सांग कशी आहे ते.”

 अवंतिका, “मग मला काय देशील.”

काका, “ तुला लॉलीपॉप देईन.”

अवंतिका, “ नको.”

काका, “ यात्रेत छानशी पर्स देईन.”

अवंतिका, “नको.”

काका, “मग, काय हवे? ”

अवंतिका, “ मला बुलेट वरून संपूर्ण गावाची सफर करुन आणायची”

मल्हारी, “चालेल, सांग.”

अवंतिका, “मी पाहिलं मोठी आई आजोबांना सांगताना डावा डोळा तिने बारीक करुन इशारा केला.”

मल्हारी, “ ही काय बातमी झाली, मला वाटलं तू फोटो पाहिला असशील.”

येसाजी, “ काका, एवढं कळत नाही का? काकी व आईला बेसावध ठेवण्यासाठी तुझी बायको काळी आहे म्हणून सांगितलं असणार.”

तानाजी, “हे मात्र अगदी बरोबर आहे. मागे एकदा स्थळ आलेलं होतं. तेव्हा स्थळाचा फोटो पाहिल्यावर आई घरात आदळ आपट करीत होती.”

कार्तिक, “ माझा विश्वास आहे. मोठी आई, चुकीचा निर्णय घेणार नाही.”

येसाजी, “ आता जाणारच आहेस ना, मुलगी पहायला. मग समजेलच की. दूधाच दूध व पाण्याचं पाणी होईल.

मल्हारी, “ अस असेल तर तुझ्या तोंडांत साखर पडो.”

 कार्तिक, “ काय फक्त साखरंच. लाडू नाही.”

 मल्हारी, “ अखंड डब्बा घे.”

 मुले नाचू लागली.

…… ……. …

मुलगी पहायला जाताना मल्हारी आपला मेकअप करताना.

सरू, “ काय धाकलं मालक, आज लई आरशात बघताय.”

मल्हारी, ( हसत) : मग काय केस विंचरत असताना फरशीकडे बघू.”

सरू, “ तस नाही, रोजच्यापेक्षा जास्त पाहताय म्हणून म्हंटल. “

मल्हारी, “सरू इकडे ये.”

सरू पाण्याची घागर काखेत घेऊन जवळ येत.

सरू, “बोला, काय सेवा करू, नवरदेवाची.”

मल्हारी, “ नवरदेव म्हणू नको ग, उगाच चिडवतेस अजून कशात काय नाही.”

सरू, “ नाही कसं, मोठ्या बाई साहेबांनी स्थळ पाहिलंय म्हंटल्यावर पक्क झालं म्हणायचं.”

मल्हारी , “ बरं, ते राहू दे, मला सांग कसा दिसतोय मी?”

सरू, “ खरं सांगू, लई झ्याक दिसताय.”

आतून मोठी वाहिनी दुसऱ्या खोलीत जाताना

पार्वती, “ दिसून काय करायचं, येणारी तर काळतोंडीच आहे ना. तिला काय नवरा गोरा की काळा, कसलापण चालेल. मी काढलेलं स्थळ नको झालं. शेवटी आईच्या सांगण्याने डोलणाऱ्या नंदी बैलाच्या गळ्यात कोळसाच पडणार?”

सरू, ( हळू आवाजात) पुजारी काकांनी स्थळ काढलंय व मोठ्या बाईसाहेबांनी सांगितलय म्हणजे मुलगी चांगलीच असणार. तुम्ही जावा घोड्यावर बसून.”

मल्हारी, “ तसं जर झालं, तर मी पार्टी देईन सगळ्यांना.”

( तेवढ्यात तिथे मुले लपत छापत आली.)

येसाजी, “काय, झाली का तयारी.”

मल्हारी, “ कसा दिसतो मी?”

येसाजी, “ मस्त दिसतोस पण ती टोपी…”

मल्हारी, “ काय झालं, चांगली दिसत नाही का?”

( टोपी काढून केसांवर कंगवा फिरवत.)

 कार्तिक, “ हा, आता मस्त दिसताय.”

अवंतिका, “ काका नवरी पहायला कशातून जाणार रथातून की घोड्यावरून.”

 वासवी, “ अस काय म्हणतेस, बाहेर बघितली नाहीस का?”

तानाजी, “काय?”

वासवी, “ काळी घोडी उभा आहे ते.”

कार्तिक, “ कुठे आहे? मला दिसली नाही.”

येसाजी, “ अरे वेड्या, काळी घोडी म्हणजे बुलेट रे.”

कार्तिक हसू लागला.

वासवी, “ हसायला काय झालं.”

 कार्तिक, “ बुलेट ठीक आहे. पण पुजारी काकांना नीट न्या म्हणजे झालं. नाहीतर हाड खिळखिळी करशीला.”

सर्व हसू लागले.

……….

पुजारी काका आले. अंगणात सरू वाळवण घालत होती. लक्ष्मीबाई व सदाशिवराव बोलत बसले होते. पुजारी काकांना पाहून.

लक्ष्मीबाई, “ या बसा बुवा.”

लक्ष्मीबाई, ( सरू) “ सरू ते काम ठेव. व मल्हारीस जाऊन सांग त्या आरशात पाहत बसू नकोस म्हणावं. जसा आहेस तसा पसंत होशील आटप म्हणावं. अन् त्या महाराणींनी चहा केला असेलं तर घेऊन ये. त्यांना काय, बाहेर कोण आलंय, गेलंय याचं काही नाही. बसल्या असतील खादडत. कधी सुधारतील देव जाणे.

सरला आत गेली. मल्हारीस

सरला, “ ओ साहेब, आवरा लवकर मुराळी आलाय बाहेर. “

मल्हारी आपले आवरून बाहेर आला. बाहेरील लक्ष्मीबाईंचा आवाज ऐकून दचकलेल्या सुना एकमेकीला.

पार्वती, “म्हातारीला आतलं कसं कळतं देव जाणे. “

सरला, “ कसं म्हणजे त्रिकालज्ञानी आहेत त्या. अन् हो तुमच्या गवती चहाचा वास सगळीकडे पसरला आहे.”

सरस्वती, “ घे, बाई घेऊन जा.”

 सरला चहाचा ट्रे घेऊन आली.

सरला, “ मालकीण घ्या चहा.”

लक्ष्मीबाई, “ मला नको, पुजारी काका व मल्हारीस दे. अन् हो माझ्या खोलीत पलंगावर एक पिशवी आहे ती घेऊन ये.”

सरला , “जी.”

(तिने चहा दिला.)

लक्ष्मीबाई, “ वासवी ए वासवी.”

वासवी, “ काय मोठी आई.”

लक्ष्मीबाई, “ हे बघ, जेवण खोलीत जा. व एका वाटीतून दही साखर घेऊन ये. त्या मांजरिणीच्या तडाख्यातून राहिले असेल तर.”

इतक्यात मल्हारी सर्वांच्या पाया पडला. शिवण्णाच्या ही पाया पडला.

शिवण्णाने आशीर्वाद दिला.

शिवण्णा, “ आयुष्यमान भव.”

मल्हारी, “ चला बुवा.”

लक्ष्मीबाई, “ चला कुठं, थांब एक मिनिट.”

लक्ष्मीबाई, “ सरू ये सरू, सापडली नाही का पिशवी.”

सरू, “ हा सापडली, आले आले.”

लक्ष्मीबाई, “ वासवी ते वासवी.”

वासवी, “ आले, आले.”

वासवी दही साखर घेऊन जेवण खोलीतून जाताना.

सरस्वती, “ बघूया, कुठली अप्सरा आणतात ते.”

पार्वती, “ आमच्या पेक्षा डावीच मिळणार.”

वासवी, “ तुम्ही काही पण म्हणा, पण काकांचं लग्न झालं की तुमची काही धडगत नाही.”

पार्वती, “ कारटे, आजीची चोमडी कुठली?’

वासावी बाहेर आली. दही साखर पुजारी व मल्हारी काकांच्या हातावर दिले. ते प्राशन त्यांनी केले . इतक्यात सरू आली. तिने पिशवी दिली. पुजारी बुवांनी चहाचा कप सरुच्या हातात देवून मल्हारीच्या गाडीवर बसले. ते दोघे निघाले.

…… …,. ……..


क्रमशः पुढे ......

रविवार, २६ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग १०

अस्तित्व पटकथा भाग १० अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,


क्रमशः पुढे...... चालू 

 सोमवार उमेच्या गावातील शिव मंदिर उमा देवास आली. देवपूजा केली. पुजाऱ्याच्या मुलाने नैवेद्य दाखवला. गावातील शाम भट्ट पुजारी व मधुकर पुजारी मंदिराच्या बाहेर बोलत बसले होते. उमा पूजा आटोपून घरी जाताना नमस्कार करून निघून गेली.

मधुकर पुजारी, “ किती संस्कारी मुलगी आहे.”

शाम भट्ट, “ हो उमा आहेच गुणी अन् संस्कारी व सुशिक्षित ही.”

मधुकर पुजारी, “ कोणाची आहे मुलगी?”

शाम भट्ट, “ गावच्या गणपत पाटलांची. सर्व व्यवहारात हुशार व गुणी आहे लहानपणी आई वारली, तिच्या मावशीने सावत्र आई होऊन सांभाळ केला.”

मधुकर पुजारी, “ तिची कुंडली मिळेल का?”

शाम भट्ट, “ हो, आहे माझ्याकडे मीच काढली होती. परवा तिचा बाप आला होता. स्थळ शोधताहेत. आहे का कोण मुलगा नजरेत.”

 मधुकर पुजारी, “ हो आहे, आमच्या इथल्या पाटलांचा मुलगा. मल्हारी त्याच्या लग्नाचं चाललंय बघायचं.”

 शाम भट्ट, “मुलगा जर चांगला असेल तर सांगा, मी घालेन पाटलांच्या कानावर.”

 मधुकर पुजारी, “ आधी विचारुन पाहतो. तुम्ही पण घाला कानावर. देवाची मर्जी असेल तर जमेल कल्याणी बंधन.”

“बर येतो आता. खूप उशीर होईल. राम राम.”

शाम भट्ट, “राम राम.”

( पुजारी निघून गेले.)

…. …… …….

सुर्यगाव पाटीलवाडा मल्हारीच्या घरी

लक्ष्मीबाई शांत वाड्यात पाळण्यावर ओसरीत बसलेली शांत विचार करत, सदाशिवराव येऊन

सदाशिवराव, “ कसला एवढा विचार करताय?”

लक्ष्मीबाई, “ आणखी कसला, मल्हारीचा?”

सदाशिवराव, “ त्याचा काय एवढा विचार करताय?”

लक्ष्मीबाई, “ लग्नाचं बघायला नको का त्याच्या.”

सदाशिवराव, “ येताहेत ना स्थळ त्याला, बघू एखादं.”

लक्ष्मीबाई, “ ते ही काड्या टाकून कोणतरी मोडतंय.”

सदाशिवराव, “ काळजी करु नकोस. मी बोलावलेय मधुकर भट्टांना?”

( वाड्यात मधुकर पुजारी आले. ओसरीत शिवाण्णा गडी नारळ सोलत होता. आल्यावर.)

शिवण्णा, “ राम राम पुजारी बुवा. “

पुजारी, “ राम राम….”

वाड्यात बाहेर असलेल्या हौदजवळ आपले हात पाय धुवून आत ओसरीवर आले. आल्यावर

पाटील सदाशिवराव, “ या पुजारी बुवा, आत्ताच आठवण काढली होती.”

 पुजारी, “ राम राम. “

पाटील, “ या बसा.”

पुजारी बसल्यावर.

 लक्ष्मीबाई, “ सरला ये सरला, गुळ पाणी आण.”

नोकरांनी पाणी घेऊन आली. तिने गुळ पाणी दिले.

लक्ष्मीबाई, “ जरा चहापानाचं बघा म्हणावं.”

नोकरांनी, “ जी .”

 ती आतमध्ये गेली.

……… ……..,

सदाशिवराव, “ काय म्हणताय, बाकी मजेत ना,”

मधुकर पुजारी, “ काळभैरीच्यि कृपेने सर्व ठीक आहे. “

( आपल्या जवळील पिशवीत हात घालत.)

पुजारी, “ आपण मागे बोलला होतात. स्थळाबद्दल. माझ्या नजरेत एक स्थळ आहे. शाम भट्टांकडे परवा गेलो होतो. तिथे असगावात गणपतराव पाटलांची एक मुलगी आहे. उमा, खूप सुशील व गुणी आहे. मी म्हणतो, मल्हारीस दाखवली तर. हा फोटो व कुंडली.”

लक्ष्मीबाई, “त्यात काय विचारायचं, दाखवा की, त्याला पसंत पडली म्हणजे झालं …”

( सदाशिवराव व लक्ष्मीबाई फोटो पाहतात.)

पुजारी, “ मी कुंडली सुद्धा जुळवून पाहिलीय. ३६ पैकी ३४ गुण जुळतात बघा. अगदी शिव पार्वतीचा जोडा शोभेल हो.”

सदाशिवराव, “चालेल की बघा.”

( त्याचवेळी मल्हारी बाहेरून आला. हात पाय बाहेर हौदला धूत असताना चपला बाहेरील पाहून शिवण्णास.)

मल्हारी, “कोण आलंय.”

शिवण्णा, “ पुजारी काका आलेत स्थळ घेऊन.”

( हाताची पिपाणी सारखी ऍक्शन करत. पी पी पी…. करायला.)

(मल्हारी हात पाय धुवून चोर पावलांनी आपल्या खोलीकडे जाताना लक्ष्मीबाईंना दिसला. त्यानी सदाशिवरावांना इशारा केला.)

 सदाशिवराव, “मल्हारी.”

मल्हारी झटकन वळला.

मल्हारी, “ काय, अण्णा.”

सदाशिवराव, “काही नाही तुला एक स्थळ आलेय.”

मल्हारी, “बर.”

सदाशिवराव, “ तुझं मत काय?”

मल्हारी, “तुम्ही म्हणाल तसे.”

सदाशिवराव, “ पोरगी जरा सावळी आहे. पण बरी आहे.”

लक्ष्मीबाई, “ आता शेतकऱ्याला कोण मुलगी देतयं. चालायचंच, जरा चकणी आहे. पण चालेल.”

सदाशिवरावानी पुजाऱ्यांना इशारा केला.

पुजारी हसत, “ अहो शेतकरी म्हंटल्यावर कोण शिकलेली मुलगी देत का?”

लक्ष्मीबाई, “ आमची काही हरकत नाही. पण वरास दाखवा एकदा. मुलगी सुशील असली म्हणजे झालं.”

मल्हारी शांतपणे पुढ्यात उभा होता.

मधुकर पुजारी, “ आ…उद्या.. नको परवाच जाऊ, चांगला दिवस आहे, पुष्य नक्षत्र आहे तेव्हा. चालेल , परवा बघा. तुमची हरकत नसेल तर.”

सदाशिवराव, “ चालेल की. “

“ तुझी काही हरकत नाही ना. तुझं काय मत यावर.”

मल्हारी, “ परवा जरा शेतावर काम होतं.”

 लक्ष्मीबाई, “ ते काम बीम राहु दे , बघतील दुसरी. परवा तू तयार व्हायचं. अन् सुटायचं, पुजारी बुवांना घेऊन समजलं काय?”

इतक्यात सरला चहा घेऊन आली.

लक्ष्मीबाई, “ घ्या, पुजारी बुवा.”

 पुजारी चहा घेऊ लागले.

…… …… ……

संध्याकाळी मल्हारी आरशा समोर आपली केस विचरत होता. तिथून जवळील खोलीत वाहिनी तांदूळ सुपात घेताना.

सरस्वती, “ काय पण नटन हे. देखणेपणा असून काय उपयोग.”

पार्वती, “शेवटी कोळशाची खानचं पदरात पडायची.”

सरस्वती, “गोरी बायको मिळायला पण भाग्य लागतं.”

पार्वती, “शेवटी काय करेल बिचारा, आईच्या ताटाखालचं मांजर. आई म्हणेल तसंच वागणार. “

सरस्वती, “ शेवटी काय नशीबच फुटकं, काय करणार.”

त्या हसू लागल्या.

……. ……… …….


क्रमशः पुढे.......

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ९

 अस्तित्व पटकथा भाग ९

अस्तित्व पटकथा भाग ९ मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू ........


उमाचा रिझल्ट लागला. दहावी झाली. उमा व मैत्रिणी पास झाल्या. शाळेतून बाहेर पडल्या. घरी आल्यावर. उमा पाया पडू लागली.

आई, “ माझी गुणी बाय.”

गणपतराव, “ उमा तुला कॉलेज करत आश्रमात शस्त्र प्रशिक्षण देऊया का?”

शकुंतला, “ कशाला हवे पोरीच्या जातीला, उद्या नवऱ्याचे हात - पाय मोडायची. कायतरीच तुमचं आपलं.”

आजी, “ तिचं काय ऐकतोस. घाल पोरीला. शिकु देत.”

शकुंतला, “ लग्न झाल्यावर नवऱ्याच डोकं फोडून माहेरी नाही आली म्हणजे झालं.”

आजी, “ ती काही अर्ध्या डोक्याची नाही. अन् आली तर खाऊन संपणार नाही तिला आयुष्यभर इथं. इतकं हाय.”

शकुंतला, “मग बस घेऊन घरात.?”

ती रागाने आत गेली. आजीने गणपतराव ना इशारा केला.

….. …….

दिवसांची वेळ बारा वाजले. कॉलेजमध्ये फॉर्म भरायला गर्दी उसळली. उमाने कॉलेजमध्ये फॉर्म भरला. तसेच गुरुकुल मध्ये तिने शस्त्र व धार्मिक शिक्षण घ्यायला तिने सुरुवात केली. तिच्या मैत्रिणींना त्यांच्या घरातील मंडळींनी शिक्षण थांबवले होते. त्या फक्त कॉलेज करत असत. उमा आश्रमात शिकलेले सर्व ज्ञान आपल्या मैत्रिणींना रविवारी शिकवत असे. तिने चांगले मार्क मिळवले. व शस्त्र कला ही शिकली. तिच्या मैत्रिणींची मात्र दोन वर्षात लग्न उरकली गेली.

……….. …………..

सकाळची वेळ, मल्हारी घरातून गाडी घेऊन शेताकडे निघालेला होता. वाटेत एक स्त्रीने लिफ्ट साठी हात केला.

स्त्री, “ अहो, थांबा, थांबा.”

मल्हारी, “ काय हाय?”

स्त्री, “ मला थोडं पुढे सोडता का? बाकीच्या स्त्रिया पुढे गेल्यात. मला वेळ झालाय.”

मल्हारी, “ बरं, बसा.”

तो गाडी चालवू लागला. अचानक थोडं पुढे गेल्यावर त्या स्त्रीने त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मल्हारीने गाडी थांबवली.

मल्हारी, “ ये, चल उतर.”

स्त्री, “ अस काय हे , तुम्हाला काहीच वाटत नाही का?”

मल्हारी, “ मला काय वाटू अगर न वाटू देत, तू उतर खाली.”

ती गाडीवरून उतरली. मल्हारी गाडी घेऊन पुढे गेला. पण या सर्व धामधुमीत नदीला निर्माल्य सोडायला गेलेल्या पुजाऱ्याने पहिले.

….. ……. ……….

 मल्हारीचे वडील दुसऱ्यादिवशी सकाळी गावातून फेर फटका मारायला गावातून चाललेले होते. ते देवळात देवदर्शनासाठी गेले असताना. देवळात जाऊन घंटी वाजवून पाया पडले.

पुजारी प्रसाद देत.

पुजारी, “हा घ्या.”

सदाशिवराव, “ जी “

प्रसाद घेतल्यावर.

पुजारी, “मला थोड बोलायचं होतं.”

सदाशिवराव, “ बोला की.”

पुजारी, “नाही म्हटलं, मल्हारी आता मोठा झालाय, लग्नाचं बघता की नाही त्याच्या.”

सदाशिवराव, “ चाललंय पहायचं. बघू कुठे जुळते का?”

मधुकर पुजारी, “ तसं नाही, काल मी नदीहून येताना बसवण्णाची पोर बघितली मल्हारीच्या गाडीवर, तुम्हाला माहित आहे ना ती कशी आहे ती. नाहक बदनामी नको. वेळीच निर्णय घेतलेला बरा. “

सदाशिवराव, “बर झालं सांगितलं तुम्ही ते. तुम्ही पण बघा एखादं स्थळ. टाकू उडवून बार.”

पुजारी, “बरं, बरं, बघतो.”

सदाशिवराव, “ बर निघतो आता.”

पुजारी, “जी “

देवळातील घंटी वाजल्याचा आवाज होतो.

….. …… …….


सोमवार, १३ एप्रिल, २०२६

अस्तित्व पटकथा भाग ८

 अस्तित्व पटकथा भाग  ८

अस्तित्व पटकथा भाग ८,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,

क्रमशः पुढे चालू.......

संध्याकाळी घराच्या अंगणात आई, मल्हारी व मुले एकमेकास तेल चोळत होते. मल्हारी शेवटी होता. आई डोक्यावर मल्हारीच्या तेल घालत होती.

लक्ष्मीबाई, “ मल्हारी विचार न करता छोट्या छोट्या गोष्टींसाठी असा जीव धोक्यात घालणं बरं नव्हे.”

मल्हारी, “ आई, छोट्या गोष्टीतूनच मोठ्या घटना घडत जातात.”

लक्ष्मीबाई, “ लई, शहाणा आहेस.”

मल्हारी, “ शहाणा अस काही नाही. पण बुद्धिमान म्हणालीस तरी चालेल. जर आज मी हे धाडस केलं नसतं, तर रोज एखादा चोर घरी, दारी, रानात, शेतवडीत चोरी करू लागतील. डाके घालू लागतील. कारण एकदा मऊ लागलं. की बरेच ससे चरायला येतील.”

लक्ष्मीबाई, “बराच ठग आहेस की?”

 कार्तिक, “ ठग म्हणजे काय रे काका?.”

मल्हारी, ( कार्तिकाचे डोके चोळत) अरे, ठग म्हणजे असा हुशार माणूस जो तुम्हाला फसवून आपले काम फत्ते करुन गेलेला ही तुम्हाला कळणार नाही.”

 लक्ष्मीबाई, “बर चला खूप झाली तेल मालिश. मला खूप कामे आहेत.”

कार्तिक, “तू गप्प बस, कामे करतील आई व काकी.”

( सर्व हसू लागले.)

…… ….. …….

 स्वयंपाक घरात जेवण करत होत्या. एक भाजी चिरत तर दुसरी फोडणी देत होती.

सरस्वती, “पाहिलंस मामांजीनी घराण्याची चेन धाकल्या भाऊजींना दिली.”

पार्वती, “हो बघितलं. सासूबाईंचा लाडका आहे ना. खूपच लाड चाललेत.”

सरस्वती, “आमच्या यांना कळतच नाही. मागच सांगत होते वेगळे होऊ म्हणून. तर एक नाही की दोन नाही. या घरात जेवण करतच म्हाताऱ्या होऊ.”

पार्वती, “ तर काय, सगळा व्यवहार मामांजीकडे, आता तरी मुलांच्या हातात सत्ता द्या म्हणावं.”

सरस्वती, “आमचे हे उत्तम शेत सांभाळतील.”

पार्वती, “ आमच्या ह्यांना काय जमत नाही हो, पण द्यायला तर हवं.”

( इतक्यात स्वयंपाक घरात प्रवेश करत.)

लक्ष्मीबाई, “ झाला की नाही स्वयंपाक अजून.”

( त्या बोलणे थांबवून.)

पार्वती, “हो होतेय.”

लक्ष्मीबाई, “हा हात हलवा लवकर, ती मोलकरीण बाकीचे धुणे, पाणी , झाडलोट करते. तुम्हा दोघींना साधं जेवणही जमत नाही का लवकर करायला. काय माहेरी शिकवलच नाही.”

सरस्वती, “ हे काय, झालंच, थोडा वेळ आणखीन.”

लक्ष्मीबाई, “जेवण करताना बडबड कमी व हात हलवले की होते लवकर.”

लक्ष्मीबाई, “आणखी एक सांगायचंय तुम्हाला, व्यवहारचं म्हणाल तर, एकवेळ तुमच्या मुलांच्या हातात जाईल. पण तुमच्या नवऱ्यांच्या विसरा. साधं खंडभागाच्या शेतातून खंड मोजून आणता येत नाही. तिथं बाकीचा व्यवहार सोडाच. व राहता राहिला मल्हारीचा प्रश्न, त्याने दोन वर्ष नियोजन हाती घेतलं. म्हणून तुमच्या नवऱ्यांनी नको ते नाद करुन केलेली देणी भागवून घर चालवलं. तस पहायला गेल तर इथं त्या देण्याची तुलना करता तुमच्या वाट्याला एकर भर रान सुद्धा येणार नाही. घर भांडी सोडाच.”

लक्ष्मीबाई, “ तुमचा दीर प्रेमळ आहे, म्हणून नाहीतर एखाद्याने तुमचे हे थेर बघितले असते. तर केंव्हाच घरातून बाहेर हाकलले असते. त्या मुलांकडे पाहून सहन करतोय सगळं, त्यामुळे इथून पुढे जीभ सांभाळून.”

लक्ष्मीबाई, “आणखी चेनेच बोलत असाल, तर तो होता म्हणून ती चेन घरात आली. तुमच्या नवऱ्याच्या हातात असती तर आतापर्यंत नाचणारीच्या पायावर गेली असती. लागा कामाला.”

 सुनांना सुनावून ती बाहेर आली. हॉलमध्ये आल्यावर.

सदाशिवराव, “सुनांना बोलल्याशिवाय चैन पडत नाही का तुम्हाला?”

लक्ष्मीबाई, “त्या आहेतच त्या गुणांच्या, मघाशी चैन मल्हारीला दिली तेव्हा तोंड पहिलीत का त्यांची.”

सदाशिवराव, “स्त्री सुलभ सोन आवडायचं त्यांना.”

लक्ष्मीबाई, “मग या जावा म्हणावं माहेराहून घेऊन, नाहीतर नवऱ्यांना राबवा म्हणावं आपल्या, अन् घाला म्हणावं कमवून सोनं.”

सदाशिवराव, “शांत हो, ऐकलं तर काय वाटेल त्यांना.”

लक्ष्मीबाई, “वाटू देत काय वाटायचं ते, मला नाही येतं दया, लहान लहान मुले सासरी ठेवून माहेराला जाऊन चैन करणाऱ्यांना पायाखालीच ठेवलं पाहिजे. अन् हो तुम्हाला जर का एवढा पुळका असेल तर जावा आत मदतीला. तुम्हाला कामाला लावून बाजूला जाऊन बसतील त्या.”

इतक्यात शांताबाई तिथे आली.

शांताबाई, “ मालकीण बाई, थोडं पैसे हवे होते.”

लक्ष्मीबाई, “किती हवेत?”

 शांताबाई, “ दोन हजार.”

 लक्ष्मीबाई, “ थांब देते.”

लक्ष्मीबाई आत खोलीत जाऊन पैसे घेऊन आली. व तिला दिले.

लक्ष्मीबाई, “ हे घे, अन् हो जाताना बाहेरील बाकड्यावर केळी काढून ठेवली आहेत. जाताना जा घेऊन , नाहीतर जाशील तशीच.”

शांताबाई, “ बरं “

शांताबाई निघाली. जाताना केळी घेऊन गेली.

…… …. …….

क्रमशः पुढे