अस्तित्व पटकथा भाग १८
अस्तित्व पटकथा भाग १८, अस्तित्व पटकथा भाग ,मराठी पटकथा,फिल्म स्क्रिप्ट,स्टोरी,story,marathi film,
क्रमशः पुढे चालू ......
उमा बाहेर आल्यावर तिथून पुढे गावातील लोकांच्या प्रश्नाचा ससेमिरा मागे लागेल. म्हणून मुलांबरोबर रानात गेली. तिथे मुले बॉलने खेळत होती. तिथेच शेजारून रस्ता गेलेला होता. खेळताना छोट्या महिपतीने बॉल मारला. तो थेट रानातील विहिरीत गेला. तेव्हा.
महादू, “ खाल्लस शेण, तुला हजारदा सांगितलंय जरा बॉल दमान मारत जा. आता गेला ना विहिरीत. आता काय तुझा आज्जा येणार आहे का काढायला?”
महिपती, “लई बोलू नकोस मी काढतो.”
श्रीपती, “ तोंड बघा बॉल काढणार्याचं. पोहता येतं का?”
महिपती, “काढतो मी.”
तो धावत गेला. काठीने बॉल काढू लागला. त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला.
मुले, “वाचवा, वाचवा, महिपती पडला.”
इतक्यात तिकडे रानात आलेली उमा जी झाडाखाली शांत बसली होती. ती आवाज ऐकून धावत गेली. विहिरीत उडी टाकली. त्याचवेळी मल्हारी व त्याचे आई वडील गाडीतून निघाले होते. मुलांचा आवाज ऐकून लक्ष्मीबाईनी गाडी थांबवण्यास सांगितली.
लक्ष्मीबाई, “ड्रायव्हर गाडी थांबवा. मल्हारी, धाव विहिरीकडे कोण पडलय बघ?”
मल्हारीने वेगाने दार उघडून धावत जाऊन विहिरीत उडी मारली. उमा महिपतीला शोधत होती. मल्हारीने बुडी मारुन महिपतीला पाण्याच्या बाहेर काढले. त्याचे पोट दाबून पाणी काढले. महिपती शुद्धीवर आला. त्यावेळी मल्हारीचे भिजलेल्या उमाकडे व उमाचे त्याच्याकडे लक्ष गेले. नजरा नजर झाली. उमा बाहेर विहिरीच्या पायरीवरून जाऊ लागली. मल्हारीने तिचा हात धरला. उमा हात सोडवून..
उमा, “आता काय काम आहे इथे. की दुसरं स्थळ पहायला निघालाय.”
मल्हारी, “ दुसर नाही, पहिलंच जुळवायला आलोय. “
उमा, “ घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करुन तोंडघशी पाडण्यापेक्षा आधीच नकार द्यायचा. उगाच कशाला घरी बोलवायचे.”
मल्हारी, “ अपमान कोणी केला. मी तर नाही.”
इतक्यात लक्ष्मीबाई व सदाशिवराव तिथे आले. मल्हारी व उमाचे बोलणे ऐकून लक्ष्मीबाई, “कोण ग तू, व विहिरीत का उडी घेतलीस.”
मल्हारी, “काय करेल बिचारी, घरी आलेल्या स्थळांन नकार दिल्यावर.”
उमाने तिरकस नजरेने पाहिले. ….
लक्ष्मीबाई, “ म्हणजे?”
मल्हारी, “ हीच ती, तुझ्या मुलाच्या कपाळावर विटीचा प्रसाद देणारी, तुझी होणारी….”
लक्ष्मीबाई, “उमा का?”
तिच्याकडे पाहून
“ अगं, भिजलीस की, थांब हा.”
“अहो, आणा ती पिशवी इकडे.”
सदाशिवरावांनी पिशवी दिली.
लक्ष्मीबाई, “ हा, घे, ही साडी अन् नेसून ये.”
उमा बाजूला झाडीत जाऊन साडी गुंडाळून आली.
लक्ष्मीबाई, “आता चल बस गाडीत अन् तुझ्या वाड्याची वाट दाखव.”
मल्हारी, “ हे आपलं बरं हाय, इथे मी भिजल्याचे काही नाही. व सुनेचं कौतुक चाललय.”
लक्ष्मीबाई, “ ये, गप्प, चल ग बस.”
उमा गाडीत बसली. गाडी निघाली. थोड्याच वेळात उमाच्या अंगणात पोहोचली. सर्वजण उतरले. गणपतराव झोपाळ्यावरून पाहतात. उमा व मल्हारीस ओल्या अंगाने पाहून.
गणपतराव, “ अगं, ऐकलस का? बाहेर ये जरा.”
आतून शकुंतला बाहेर आली. उमाला भिजलेली पाहून.
शकुंतला, “ हे, ग काय भिजलीस कशाने?”
लक्ष्मीबाई, “ काही नाही विहिरीत एक पोरगं पडलं होतं. त्याला वाचवताना दोघे भिजलीत. त्यांना कपडे द्या बदलायला.
शकुंतला, “चल आत.”
ती दोघे आत गेला. उमाने आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. शकुंतलाने आपल्या नवऱ्याचे धोतर व सदरा जे ठेवणीतले होते. ते मल्हारीस दिले. त्याने कपडे बदलले.
तोपर्यंत बाहेर गणपतराव व आजी, सदाशिवराव व लक्ष्मीबाईशी गप्पा करत बसले होते.
गणपतराव, “आपण…”
सदाशिवराव, “ आम्ही मल्हारीचे आई बाबा आहोत. व लग्नाची बोलणी करायला आलो आहोत.”
इतक्यात शकुंतला आतून चहा घेऊन आली. ते सर्व चहा घेत.
शकुंतला, “ पण आपल्या घरातील इतर मंडळींना …..”
लक्ष्मीबाई, “त्याचं सोडा हो, लग्न कुणाला करायचं आहे. मल्हारीला , त्याला मुलगी पसंत आहे व आता आम्ही पहिली, आमचा पण होकार आहे. तुमचं मत सांगा.”
शकुंतला, “ पण ते फोटो, चिठ्ठी.”
लक्ष्मीबाई, “ हे बघा, मला पूर्वीच कल्पना होती. माझी मैत्रीण आहे या गावात. शिवण्णा कुंभाराची बायको. तिच्याकडून सगळं माहीत आहे, अहो, आपल्या मुली झाडावर चढतात, शाळा शिकतात, घर सांभाळतात, काय बिघडलं त्यात. धडपडतातच ना. मला तर बाई मऊ मांजरीण नाही आवडतं. माझ्या मल्हारीला उमा शोभून दिसेल. तुमचं मत सांगा.”
शकुंतलाने नवऱ्याकडे पाहून डोळ्याने इशारा केला.
गणपतराव, “ आमचा होकार आहे. आता द्याय घ्यायचं बोला.”
लक्ष्मीबाई, “ हे बघा आमच्याकडे देवाने भरपूर दिले आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने काय घालाल ते घाला. नारळ मुलगी दिली तरी चालेल.”
आजी, “ मग बघता काय फोडा सुपारी.”
लक्ष्मीबाई, “ नुसती सुपारी नाही, लग्नच लावायचं बोला.”
उमाच लग्न ठरलं व तिचं व मल्हारीच लग्न लावलं गेलं.
……… ………. ……….
क्रमशः पुढे .......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा